जनता जनार्दन आणि सोशल डिस्टंसिंग !
कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतासह जगभरातील अनेक देशाने लॉकडाऊन पद्धतीचा अवलंब केला. त्यामुळे भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत अव्वल स्थानी असलेल्या महाराष्ट्रात देखील मागील 70 दिवसांपासून जिवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद होती. परंतु इतके दिवस सर्व बाजारपेठ बंद असल्याने अर्थव्यवस्था देखील मजबूत करणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन सरकारने आज पासून लॉकडाऊन मध्ये बऱ्याच सवलती दिल्या आहेत. देशव्यापी लॉकडाऊन करुन 70 दिवसांहुन अधिक कालावधी होऊनही कोरोना विषाणू वर अपेक्षित नियंत्रण सरकारला मिळवता आले नाही. परंतु इतके दिवस झाल्यामुळे आता मजबुरीने का होईना सरकारला आता दुकाने आणि बाजारपेठ सुरू करणे भागच होते. आता आपल्या स्वत:लाच आपली स्वत:ची काळजी घ्यावी लागेल यात दुमत नाही.
तब्बल 70 दिवसांनी आज मार्केट सुरू झाले आणि मार्केटमध्ये गेलो आणि मार्केट मधली परिस्थिती बघून हा थ्रेड लिहावासा वाटला ! आज सरकार वर नाही, मला आपल्या लोकांवर टीका करायची आहे! त्यात मी सुदधा आहे. लोकांना किती जाणीव आहे या कोरोनाची ? खरच लोक सोशल डिस्टेंसिंग पाळत आहेत का ? असे अनेक प्रश्न बाजारपेठेत गेल्यावर मला पडले.
मार्केट मध्ये गेल्यावर लोक आपल्या आजूबाजूला काहीही झालेलं नाही या अविर्भावात जगत होते! बहुतांश लोकांच्या तोंडाला मास्क नाही आणि सोशल डिस्टेंसिंग तर जणु लोकांना माहीतच नाही ! बहुतांश दुकानासमोर लोक अशी काही गर्दी करून उभे होते जणू आजच सगळं सामान संपणार आहे. नेहमीप्रमाणे आपल्या गाडीचा हॉर्न वाजवत फिरणारे गाडीवर दोन- तीन जण घेऊन असे फिरत होते जणु कोरोना यांनीच बनवलाय आणि यांना तो होणारच नाही. रस्त्यानी जाताना लोक अजूनही थुंकत आहेत! मार्केट आज प्रचंड गजबजलेलं होतं, दुकानं खचाखच भरलेली!
दारू तर लोक असे विकत घेत होते की दारू जर नाही पिली तर ते लगेचच मरतीलच! या सगळ्यात मला वाईट त्या लोकांचं वाटतं जे खऱ्याअर्थाने लॉकडाऊन पाळत आहेत. मान्य आहे सरकार बऱ्याच बाबतीत चुकले आहे, सरकार वर आपण टीका करत आहोत, काही जण राज्य सरकारवर तर काही जण केंद्र सरकारवर! पण लोकांमध्येच जर या गोष्टीची खबरदारी नसेल तर कुठे कुठे पोहोचणार सरकार ? आता कोणतंही सरकार असो तुम्हाला हाताला धरून घरी बसायला घेऊन जाणार नाहीये! तुम्हाला स्वतःची काळजी घेणंच या सगळ्यात आवश्यक आहे ! नशिबाने काही शहरात एकही रुग्ण नाही, पण म्हणून इतकी बेफिकिरी ? उद्या जर काही झालं आणि कोरोना नसलेल्या शहरांत जर कोरोना पसरला तर कुणाला नाव ठेवणार आहात ? यात स्थानिक पातळीवर सुद्धा तितकीच दक्षता घेणं गरजेचं आहे ! दुर्दैवाने तसे होताना मुळीच दिसत नाहीये.
सरकार ची चूक आहे की नाही हा प्रश्नच वेगळा आहे पण लोकांची देखील चूक आहे यात दुमत नाही ! लोक, सगळं नॉर्मल झाल्यासारखं जे वागत आहेत ते फार घातक आहे आपल्या शहरासाठी, राज्यासाठी आणि परिणामी देशासाठी ! खरच, आपल्या देशात सुजाण नागरिकांची प्रचंड टंचाई आहे ! आज बाजारपेठेत जे काही दृश्य पाहिलं ते घाबरवून टाकणारं होतं ! एका ठिकाणी रोज स्वतःच्या मनाला सांगड घालायची की लवकरात लवकर हे सगळं बरं होऊन आपण आपल्या नॉर्मल लाईफ ला लागणार आहोत आणि दुसरी कडे असं वागायचं !
जो पर्यंत आपल्या देशातल्या लोकांच्या मनात एकंदरीतच जाणते पणा येत नाही, आपण या देशाचे नागरिक आहोत आपल्या पण काही जबाबदाऱ्या आहेत हे जो पर्यंत लोकांच्या लक्षात येत नाही तो पर्यंत कोणीही कितीही प्रयत्न केला तरी देशाची प्रगती होणं अजिबात शक्य नाही आणि आजकाल जे ट्रेंडमध्ये आहे ना 'आत्मनिर्भर भारत' ते तर मुळीच शक्य नाही !
असो,जे होईल ते होईल म्हणायचं आणि पुन्हा स्वतःला घरात डांबून ठेवायचं !
✒️ नवनित कुमार तापडिया