आजघडीला भारत, अमेरिकेसह सबंध जग कोरोना विषाणू सोबत दोन हात करीत आहे. संपुर्ण जगावर जणु कोरोना विषाणू ने आक्रमण केल्याचे दिसत आहे. या विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी अजुन तरी जगाच्या बाजारपेठेत कुठेही लस तयार झालेली नाही. त्यामुळे जागतीक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू संदर्भात प्रसिद्ध केलेल्या सुचनांप्रमाणे जगातील बहुतांश देशांनी या जिवघेण्या विषाणू चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संपूर्ण टाळेबंदी ( लॉकडाऊन ) या पर्यायाचा अवलंब केला. यामुळे सध्या तरी संपूर्ण जगच जणु लॉकडाऊन असल्याचे न भूतो न भविष्यती असे चित्र दिसत आहे. यामुळे अनेक देशांतील बहुतांश जनतेला लॉकडाऊन संपल्यावर सर्वकाही पुर्ववत होईल का ? असा प्रश्न भेडसावत असणार परंतु सध्या तरी या प्रश्नाचे उत्तर नकारात्मक येणार असल्याचे भासत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार 'सामाजिक अंतर' (सोशल डिस्टंसिंग) हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आजघडीला जगभरातील सर्व प्रकारच्या क्रिडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच भारतासह काही देशांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील लॉकडाऊन काळात बंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सर्व धार्मिक यात्रा, राजकीय सभा इत्यादी सध्या स्थगित करण्यात आल्या आहेत. कारण अशा ठिकाणी लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते आणि गर्दी मध्ये कोरोना विषाणुचा संसर्ग अधिक वेगाने होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे घराबाहेर पडताना मास्क घालणे अनिवार्य झाले आहे. कदाचित भविष्यात मास्क हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला नाही तर नवलच.
भारतासारख्या विकसनशील व अधिक लोकसंख्या असलेल्या देशाने या विषाणू वर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळविले असले तरी अजुन संपूर्ण धोका टळलेला नाही. त्यामुळे 03 मे नंतर सर्वकाही पुर्ववत होणार नाही हे मात्र निश्चित. कारण आजपर्यंत या विषाणू वर कुठेच लस मिळाली नाही आणि जर भविष्यात कोरोना प्रतिबंधित लस शोधता आली नाही तर या विषाणू चे असे आक्रमण अधूनमधून होतच राहील आणि यावर उपाय म्हणून सामाजिक अंतर राखणे, स्वत: ला वेळोवेळी निर्जंतुक करून घेणे, नेहमी हात धुणे याला पर्याय नसेल. त्यामुळे सामाजिक अंतर पाळणे ही मजबुरीच पुढील काळात नव्या व्यवस्थेला जन्म देणार हे मात्र निश्चित.
ही नवी व्यवस्था मानवी समाजाचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून टाकणारी असेल. आरोग्य व्यवस्था, अर्थव्यवस्था तसेच राजकीय व्यवस्थेवरही त्याचे दुरगामी परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. सामाजिक अंतर राखण्याच्या मजबुरीने लॉकडाऊन उठविल्यानंतरही चित्रपटगृहे आणि नाट्यगृहात जाऊन चित्रपट बघणे आणि नाटक बघणे शक्य होणार नाही कारण ही गृहे सुरू करायची झाल्यास किमान दोन आसन आणि दोन रांगांचे अंतर पाळावे लागतील आणि त्यामुळे तिकिटांचे दर इतके महागतील की ते सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असतिल. त्यामुळे चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघण्याचे दिवस कदाचित इतिहासजमा होतील. सामाजिक अंतर पाळायचे झाल्यास सार्वजनिक वाहतूक इतकी महागेल की ती सर्वसामान्यांना परवडणारी नसेल. आणि त्यामुळे लोक कमीत कमी प्रवास करतील. अशा नव्या व्यवस्थेचा जन्म झाल्यास घरुनच काम करण्याची ( वर्क फ्रॉम होम ) ही लॉकडाऊन काळातील तात्पुरती व्यवस्था कदाचित भविष्यात कायमस्वरूपी दिसेल. तसेच भविष्यात क्रिडा क्षेत्रात देखील बरेच बदल झालेले दिसु शकतात. प्रेक्षकांविना सामने हेच कदाचित क्रिडा क्षेत्राचे भविष्य असु शकते.
आजवर विकसित पाश्चात्य देशांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर जगावर आपली मजबुत पकड बनवून ठेवली होती. मात्र कोरोना आपत्तीसमोर त्यांनी सपशेल हार पत्करल्याचे चित्र दिसत आहे. तुलनेत भारतासारख्या विकसनशील देशांनी या आपत्तीला खुप चांगल्या रीतीने तोंड दिले आहे. परिणामी भविष्यात पाश्चिमात्य देशांची जागांवरील पकड चांगलीच ढिली होऊन नवी जागतिक व्यवस्था उदयास येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित या गोष्टी प्रत्यक्षात घडणार नाहीत, कदाचित काही घडतीलही किंवा याहुन काही वेगळेही घडेल पण एक मात्र निश्चित लॉकडाऊन संपल्यावर सर्वकाही पुर्ववत होणार नाही. आणि त्यामुळेच जसा इतिहासात बीसी आणि एडी या दोन कालदर्शक संज्ञांचा आपण नेहमी वापर करत होतो त्याचप्रमाणे यापुढे बीसी ( बिफोर कोरोना ) आणि पीसी ( पोस्ट कोरोना ) अशा दोन संज्ञा प्रचलित झाल्यास आश्चर्य वाटायला नको !
✒️ नवनित कुमार तापडिया